आटपाडी बाजार समितीच्या सभापती निवडीत कोण फुटला?
आटपाडी बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडीत भाजप आघाडीतील एक मत फुटल्याने सेना आघाडीने सत्ता मिळवली मात्र फुटलेला संचालक कोण याचं गुपित रहस्य उघडलेले नाही. भाजपच्या गोटात आणि लोकांत वेगवेगळी नावे चर्चेत आहेत.
आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या झालेल्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने 18 पैकी नऊ जागेवर विजय मिळवला होता तर विरोधी शिंदे गटाची शिवसेना, काँग्रेस आणि रासप आघाडीने नऊ जागा मिळवल्या होत्या. 18 पैकी सत्ताधारी आणि विरोधी गटाला समान नऊ नऊ जागा मिळाल्या होत्या. संचालक निवडीचे मतमोजणी झाल्यानंतर अवघ्या दोन तासात भाजप आघाडीने त्यांचे निवडून आलेले आठ संचालक अज्ञात स्थळी हलवले होते. सर्वांचे फोन बंद होते. संचालकावर इतरांचे बारीक लक्ष होते. सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडी वेळी भाजप आघाडीचे सर्व नऊ सदस्य एका वेळी एकत्र आले होते. उमेदवारी अर्ज दाखल करताना आणि मतदानाची प्रक्रियावेळी सर्व नऊही सदस्य एकत्र होते. सभापती पदावरून इच्छुकांत कुरबुर झाली होती. मात्र नेते मंडळींनी अंतर्गत वाद मिटवला होता. प्रत्यक्षात मतमोजणीत शिवसेना आघाडीला दहा मते मिळाली तर भाजप आघाडीला आठ मते मिळाल्याचे चित्र स्पष्ट झाले. निकालानंतर भाजप आघाडीचे नऊही सदस्य एकत्रच माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांच्या भेटीला गेले. तिथे बराच खल झाला. मात्र नेमका कोण फुटला हे रहस्य उलगडले नाही. प्रत्येक संचालकाने पार्टीला पॅनेल टू पॅनेल मतदान केल्याचा दावा केला आहे. सभापती निवडीनंतर कोण फुटला?, यावर वेगळेच नाव चर्चेत होती तर संध्याकाळी पुन्हा दुसरे नाव चर्चेत आले. दुसऱ्या दिवशी तिसरेच नाव चर्चेत आले. भाजपच्या गोटालाही कोण फुटला याचं खरं रहस्य अजून उलगडलेले नाही. एवढेच नव्हे तर शिवसेना आघाडीच्या गटातील आघाडीच्या कार्यकर्त्यांनाही अजून अंदाज लागलेला नाही. लोकांच्यात यावरून उलट सुलट चर्चा सुरू असून प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या पध्दतीने तर्काने नाव घेत आहे. फोन फुटला, कसा फुटला, का फुटला आशा विषयाभोवती चर्चा सुरू आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा