मुख्य सामग्रीवर वगळा

माणगंगा कारखान्याच्या निवडणुकीचे गुपित तानाजीराव पाटील यांनी उघड केले

आटपाडी ता.६- तात्कालीन सत्ताधारी पाच वर्षे कारखाना सुरू करण्यात अपयशी ठरले होते. त्यामुळे माण, सांगोला आणि आटपाडी तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी आणि सभासदांनी भेटून कारखान्याची निवडणूक लढवण्याचा प्रचंड आग्रह आणि दबाव टाकल्यामुळे निवडणूक लढवल्याचे कारण जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांनी शेटफळे येथे बोलताना सांगितले.                                            शेटफळे ता. आटपाडी येथे माणगंगा साखर कारखान्याच्या नूतन संचालकाचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. यावेळी ते बोलत होते. यावेळी बाजार समितीचे सभापती संतोष पुजारी, माणगंगेचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील, किसनराव गायकवाड, सोमनाथ गायकवाड,उपसभापती राहुल गायकवाड, संचालक सागर ढोले आदी उपस्थित होते. श्री. पाटील म्हणाले,'माणगंगा कारखाना निवडणक लढवण्याचा डोक्यात विचार नव्हता. सांगोला तालुक्यातील अनेक जण माझ्याकडे कामानिमित्त येत होते. त्यानी माझ्या कामाची पद्धत जवळून बघितली होती. त्यामुळे माण आणि सांगोला तालुक्यातील शेतकरी आठवडाभर रोज शेकड्याने मला भेटायला येत होती. तुम्ही कारखाना लढवून ताब्यात घेऊन चालू करा याचा खूप आग्रह धरला. त्यांना कारखाना आम्ही सुरू करू शकतो याची खात्री होती. माण मध्ये तर अनेक गावात माझ्या परस्पर उमेदवारी अर्ज भरण्याच्या अगोदरच शेतकऱ्यांनी ग्रामपंचायत मध्ये बैठका घेऊन शंभर टक्के पाठिंबा दिला होता. सभासद शेतकऱ्यांना आमच्या क्षमतेवर विश्वास होता. टेंभूचे पाणी आले आहे. ऊस लागवडीचे क्षेत्र वाढत चालले आहे आणि कारखाना बंद आहे त्यामुळे या उसाचे करायचे काय असा शेतकरी समोर प्रश्न आहे. तात्कालीन संचालक मंडळ पाच वर्षे कारखाना सुरू करू शकली नाहीत. लोकांचा त्यांच्यावर विश्वास राहिला नव्हता. आम्ही कारखाना सुरू करू शकतो असा शेतकऱ्यांना विश्वास होता. शेतकऱ्यांनी पाच वर्षे गतवेळच्या संचालकाचा अनुभव घेतला होता. सांगोला तालुक्यात आमदार शहाजीबापू पाटील आणि आमदार दीपकआबा साळुंखे यांना मी भेटलो. त्यांनी निवडणुकीसाठी पूर्ण ताकतीने सहकार्य करण्याचा शब्द दिला. त्यांना दोन दोन जागा देण्याच मी ठरवल होतं. लोकांतून माझ्यावर दबाव वाढत गेला. मग मी कारखान्याची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे अनेक कार्यकर्ते माझ्याकडे कामानिमित्त येत होती. त्यांनी माझे जवळून काम बघितल होत.  त्यांना आमच्या कामावर अधिक विश्वास होता. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी ॲड. बाबासाहेब देशमुख यांच्यावर कारखाना सुरू करणाऱ्यांना म्हणजेच आम्हाला पाठिंबा देण्यासाठी दबाव टाकला. अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी दुपारी एक वाजता त्यांच्यासोबत आमची चर्चा झाली. त्यांना आम्ही काही जागा देणार होतो मात्र त्यांनी कोणत्याही जागा न घेता फक्त कारखाना सुरू करण्याच्या शब्दावर दुपारी दोन वाजता त्यांनी त्यांचे सारे अर्ज माघारी घेऊन पाठिंबा दिला. या साऱ्या घडामोडी शेवटच्या दिवशी दुपारी बारा ते दोन च्या दरम्यान घडल्या. बाबासाहेब देशमुख यांनी त्यांचे अर्ज माघारी घेतल्यानंतर विरोधकांनीही त्यांचे सारेच अर्ज माघारी घेतले आणि कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली. आत्ता कारखाना सुरू करण्याची जबाबदारी आमच्यावर आली आहे. लोकांनी आमच्यावर विश्वास टाकून मोठी जबाबदारी दिली आहे.  दोन महिन्यात कारखाना सुरू होईल असा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले,' जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आणि मजुर फेडरेशनच्या निवडणुकीत आम्ही विरोधकांना चारी मुंड्या चीत केले होते. बाजार समितीच्या निवडणुकीत निम्म्या जागा जिंकल्या होत्या सभापती निवडीच्या वेळी आम्ही दहा मते घेऊन बाजी मारली. खरे तर आम्हाला अकरा मते मिळण्याची अपेक्षा होती. कारखान्याची अवस्था अत्यंत बिकट करून ठेवली आहे. कारखान्याच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड झाल्यानंतर कारखान्यातून फिरलो. तिथली परिस्थिती बघितल्यानंतर या फांद्यात पडायलाच नको होतं असं मनात वाटलं. कारखान्याचे अत्यंत वाईट अवस्था केली आहे. तो सुरू करणे खरोखर एवढं सोपं नाही. वडिलांनी उभारलेला कारखाना आठवण म्हणून वारसदार चांगल्या पद्धतीने सांभाळतात. आपल्या घरात एखादी मोटरसायकल जुनी झाली तरी आपण ती आठवण म्हणून सांभाळून ठेवतो मात्र इथे कारखान्यातील भंगार, विद्युत पंप तांब्याच्या तारा असे बरेच साहित्य भंगरात विकून कारखान्याचा खुळखुळा केला आहे. निंबवडे तलावावरून कारखान्याला आणलेल्या पाईपलाईनच्या अनेक पाइपा आणि तलावातील महागडे विद्युत पंप विकलेत. कारखान्यातील शेकडो मोटारी भंगारात घातल्या आहेत. अनेक मशिनरी खोलून त्यामध्ये असलेल्या तांब्याच्या तारा गायब झाल्या आहेत. लाईटीचे असलेले महागडे स्विच बोर्ड जाग्यावर नाहीत. वडिलांनी उभारलेल्या कारखान्याची इतकी वाईट अवस्था वारसदारांनी केल्यामुळे आज त्याच्या परतफेडीची वेळ त्यांच्यावर आली असं मला वाटतं. श्रीमंत बाबासाहेब देशमुख यांनी वरून कारखान्याच्या अवस्था बघितली तर त्यांच्या आत्म्याला काय वाटलं  असं असा सवाल केला. कामगारांच्या प्रायव्हेट फंडाचा विषय गंभीर आहे. शेतकऱ्यांच्या उसाची 8-10 कोटी देणी आहेत. जिल्हा बँकेचे 130 कोटी आणि इतर बँकेचे 103 कोटी असे विविध प्रकारची तीनशे कोटीवर देणी आहेत. कारखान्यावर लागलेल्या कामगारांच्या बरोबर अनेक जण मुंबईला गोदीत कामाला गेलेली मंडळी सेवानिवृत्त होऊन गावाकडे 50 60 लाख रुपये घेऊन आली आहेत. इथे मात्र कारखान्यातील कामगारांना पगार नाही, प्रायव्हेट फंडाचा पत्ता नाही उलट कर्जबाजारी झाली आहेत. त्यांच्या अख्ख्या आयुष्याची राख रांगोळी केली आहे. आम्ही कारखाना सुरू करणार म्हटल्यावर उत्स्फूर्तपणे कामगार कामावर हजर झाली आहेत. कारखाना सुरू झाल्यानंतर पगार द्या, पण कारखाना सुरू करा असा त्यांचा आग्रह आहे. अत्यंत उत्स्फूर्तपणे कामगार जीव लावून काम करू लागली आहे. कारखाना सुरू करणार म्हटल्यावर आमच्याकडे सहाशे मेट्रिक टन उसाची गाळपसाठी या भागातून नोंद झाली आहे. सव्वा दोनशे वर ऊस वाहतुकीसाठी ट्रॅक्टर आणि सत्तर बैलगाड्याची नोंदी झाल्या आहेत. आम्ही कारखाना सुरू करण्यासाठी रात्रीचा दिवस करून प्रयत्न सुरू केलेत मात्र विरोधक विविध ठिकाणी अर्ज आणि खोट्या तक्रारी करून कारखाना सुरू करण्यात अडथळा निर्माण करू लागलेत. दोन महिन्यात कारखाना आम्ही सुरू करूच याचा आम्हाला विश्वास आहे. ".              तानाजीराव पाटील यांनी जिल्हा बँक, मजुर फेडरेशन आणि बाजार समितीच्या निवडणुकीवर ही प्रकाशझोत टाकला. यापूर्वी जिल्हा बँकेचे संचालक पद फक्त स्वतःसाठी वापरले होते. मी गेल्यापासून शेतीच्या कर्ज पुरवठ्यात दुप्पट वाढ केली आहे. वसुलीही वाढली आहे. बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये निम्म्या म्हणजे आम्हाला नऊ जागा मिळाल्या होत्या. सभापती आणि उपसभापतीच्या निवडीत आम्हाला दहा मते मिळाली. खरे तर आम्हाला अकरा मते मिळण्याची आशा होती. कुणाला संपवण्यासाठी आमचं राजकारण अजिबात नाही. तालुक्यातील शेतकरी सक्षमपणे उभा राहील, तालुक्याचा विकास होईल, शेतकऱ्यांच्या उसाची सोय होईल". स्वागत किसनराव गायकवाड यांनी तर प्रास्ताविक प्रा. सी.पी. गायकवाड यांनी केले. आभार विजय देवकर यांनी मानले. यावेळी साहेबराव पाटील, सुभाष गायकवाड, अनिल कदम, ब्रह्मदेव होनमाने,राजेश नांगरे, विजय देवकर, दत्तात्रय पाटील, उपसरपंच ज्ञानेश्वर वाघमारे,माजी सरपंच विजय सरगर, अनिल कदम, प्रा. समाधान गायकवाड, माजी उपसरपंच निवृत्ती गायकवाड, महेंद्र भोरे, नेताजी इंगवले, वामनराव गायकवाड, सुखदेव गायकवाड, अरविंद गायकवाड आदी उपस्थित होते.  

टिप्पण्या