आटपाडी - करगणी ता आटपाडी येथे आटपाडी- सांगली या मुख्य रस्त्यावर ग्रामपंचायतीसमोर असलेले बस स्थानक अज्ञातानी पूर्णपणे काढून टाकल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. काढलेले बसस्थानक योग्य ठिकाणी बसवावे, अशी प्रवासी वर्गातून मागणी होत आहे. करगणी ता. आटपाडी येथे राजपत कंपनीने
ग्रामपंचायत आणि श्रीराम माध्यमिक महाविद्यालयासमोर बस स्थानके उभारली होती. भिवघाट, विटा आणि सांगलीकडे जाणारे प्रवासी ग्रामपंचायती समोरील बस स्थानकाचा वापर करत होते. या बस स्थानकात बसणाऱ्या प्रवासी आणि शालेय विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न काही दिवसापासून ऐरणीवर आला होता. हे स्थानक सुरक्षित नसल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू होती. दरम्यान, सुरक्षिततेच्या कारणावरूनच अज्ञात व्यक्तीनी हे बसस्थानकच तिथून हटवले आहे. त्यामुळे आता प्रवाशांना उन्हात उभे राहून बसची वाट पाहावी लागत आहे. सध्या अहिल्यादेवी होळकर पुतळ्याशेजारी 'बस स्थानक' असा फलक लावण्यात आला आहे. मात्र, तिथे प्रवाशांना बसण्यासाठी कोणतीही बैठक व्यवस्था किंवा सावली उपलब्ध नाही. परिणामी ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांची मोठी कुचंबणा होत आहे. बस स्थानक काढलेल्या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करून बस स्थानक हटवल्याची दखल सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतली असून अधिकृत परवानगीशिवाय सार्वजनिक सुविधा काढून टाकणे हा गुन्हा असल्याने, संबंधित विभागामार्फत अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा