खरसुंडी ( प्रतिनिधी)- खरसुंडी जिल्हा परिषद गटातील राजकीय वातावरण तापत चालले असून, शिवसेनेचे (शिंदे गट) उमेदवार जयदीप भोसले आणि खरसुंडी गणातील उमेदवार डॉ. मीनाक्षी पुजारी यांच्या प्रचारासाठी आता महिला शक्ती एकवटली आहे. गावभेटी आणि पदयात्रांच्या मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या आहेत.
जयदीप भोसले यांच्या समर्थनार्थ महिला कार्यकर्त्यांनी तनपुरवाडी, घुलेवाडी आणि कानकात्रेवाडी या गावांत जोरदार प्रचार फेरी काढली. या फेरीत महिलांचा सहभाग लक्षणीय होता. फेरीनंतर महिलांनी घरोघरी जाऊन इतर महिला मतदारांशी संवाद साधला.
संवाद साधताना महिला कार्यकर्त्यांनी स्वर्गीय मोहनराव (काका) बाबर, माजी आमदार स्वर्गीय अनिलभाऊ बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेली कामे, तसेच विद्यमान आमदार सुहास बाबर आणि सांगली जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांच्या माध्यमातून मतदारसंघात झालेल्या विकासकामांची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवली. "विकासाची ही परंपरा सुरू ठेवण्यासाठी शिवसेनाच हवी," अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.
जयदीप भोसले यांना गावागावातून आणि विशेषतः महिला मतदारांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. महिलांनी उत्स्फूर्तपणे प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतल्याने विरोधकांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. नागरिकांनीही यावेळेस विकासाच्या मुद्द्यावर ठाम राहून शिवसेनेला साथ देण्याची ग्वाही दिली आहे.महिलांच्या या सक्रिय सहभागामुळे खरसुंडी गटात जयदीप भोसले यांचे पारडे जड होताना दिसत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा